धाराशिव – शहरातील शिरीन कोलोनी, सुलतानपुरा आणि गालीब नगर येथील नागरिकांचा संयम अखेर सुटला असून, १८ जून २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगर पालिका समोर धडक धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. दुपारी २:३० वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे.
रस्त्यांची खड्डेमय अवस्था, तुंबलेल्या नाल्यांमुळे पसरलेला घाण व दुर्गंधीचा त्रास, वाऱ्यावर सोडलेली नागरी व्यवस्था आणि सततच्या तक्रारींनंतरही प्रशासनाचे ठोस पावले न उचलणे, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आता सहन केले जाणार नाही, असा कडक इशारा रहिवाशांनी दिला आहे.
या आंदोलनात ५० ते ७० नागरिक सहभाग घेणार असून, प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आवाज बुलंद केला जाणार आहे. ही केवळ सुरुवात असून, जर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर येत्या काळात अधिक तीव्र आंदोलनाची तयारी असल्याचेही आयोजकांनी जाहीर केले आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, "विकासाच्या गप्पा करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आम्हाला स्वच्छता, आरोग्य, आणि मूलभूत सुविधा देण्यात पुन्हा एकदा अपयश पत्कारले आहे. आता गप्प बसणार नाही!"
धाराशिव प्रशासनाने जर हे आंदोलनही दुर्लक्षित केले, तर त्याचे परिणाम गंभीर भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी युवा मशाल न्यूज शी बोलताना दिला आहे. व आंदोलन करणार असल्याबाबत आनंदनगर पोलीस ठाण्याला याची प्राथमिक माहिती दिली आहे.
0 Comments