धाराशिव : काल रात्रीपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूम, परंडा आणि वाशी तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले तुडुंब भरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
चिंचोली (ता. भूम) येथे दुर्दैवी घटना घडली. देवगनाबाई नवनाथ वारे (वय 70) यांच्या राहत्या शेडमध्ये अचानक पाणी घुसले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेतले असून भूम तालुक्यातील तांबेवाडी, इट आणि इडा या गावांतील एकूण 14 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. लाखी गावातील 12 नागरिकांचा बोटीच्या सहाय्याने, देवगाव येथील तब्बल 28 नागरिकांचा हेलिकॉप्टरद्वारे तर रुई गावातील 13 नागरिकांचा बोटीने यशस्वी बचाव करण्यात आला.
परंडा तालुक्यातील घाटपिंपरी, वागेगव्हाण व वडनेर येथे अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी NDRFची टीम दाखल झाली असून आर्मीची टीमही मदतीसाठी दाखल होत आहे. या भागात सुमारे 150 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.
जिल्हा प्रशासन, NDRF व आर्मी यांच्या मदतीने रात्रंदिवस बचावकार्य सुरू असून नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पुजार यांनी केले आहे
0 Comments